Sunday, March 30, 2025

गुढीपाडवा कथा

. *गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली कथा* 

. हरि ॐ 

" गुढीपाडवा " ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस . 

ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस. 

ज्या दिवसाची वाट पाहत, चौदावर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवनव्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस . 

प.पू. अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती. 

हरि ॐ ज्याक्षणाची वाटपहात सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांनी आनंद बहरत होता. 

सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम ,माता सीता, लक्ष्मणासह ,सुग्रीव आणि समस्त वानार सैनिकांसाहित परत आले होते. 

हनुमंत भक्तश्रेष्ठ भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहचले होते. राजमहालात पोहचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले. 

नंतर श्रीराम माता सीतासह लक्ष्मण,भरत, आणि हनुमंत अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. चौदा वर्षे संनयासाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध रंगांनी नटलेली होती . 

विविध रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजलेले होते .सर्व अयोध्या वासियांनी आपल्या लाडक्या श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी रंगबेरंगी वस्त्रांची गुढी दारात उभारली होती . 

सर्व अयोध्या वासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पंचायतन सुखावत होते, आशीर्वाद देत होते. अयोध्येचे हे सौंदर्य न्याहाळताना लक्ष्मणाची नजर एका गुढीवर गेली.जी गुढी फक्त साध्या,जुन्या वस्त्राची उभारली होती . 

त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले ," बंधू ! ती गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?" त्यावर श्रीराम म्हणाले ,"चला आपण त्या घरात जाऊन पाहूयात.

" पंचायतन त्याघरी पोहचल्यावर त्या घरातील सर्वांना अतिशय आनंद झाला . पंचायत्नाच्या स्वागतासाठी सर्वांची एकाच लगबग उडाली . श्रीरामचंद्रा बरोबरील सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले.

सर्वांचे क्षेमकुशल विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला ," फक्त आपल्या घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे ?" 

यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला " देवा,आपण येणार म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. 

पण आमच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून दुखी होतो . मनोमन तुमची प्रार्थना करत होतो कि त्यांना तुमचे दर्शन होवो.पण त्यांनी त्यांची अखेरची घटिका ओळखली होती .

त्यांनी घरातील सर्वांना जवळ बोलावून घेतले व म्हणाले,' मला काही श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही असे वाटते.माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक आहेत . 

तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू नका.त्याऐवजी श्रीरामचंद्राच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हा..' 

'माझी फक्त एकच इच्छा आहे ,तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या वस्त्राने उभारा , कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले होते तेव्हा त्यांची चरण धूळ या वस्त्रामध्ये मला 'कृपाशीर्वाद' म्हणून मिळाली होती.' " सर्वांचे डोळे पाण्याने भरले .

श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव करुणा दाटली होती. श्रीराम गुढी जवळ गेले व त्यांनी आपल्या कंबरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या गुढीवरील ते जुने वस्त्र आपल्या कंबरेला बांधले.

तो क्षण सर्वांच्या मनाला मोहून गेला.तो क्षण श्रीरामचंद्राची त्यांच्या भक्तांबध्ल असणार्या प्रेमाची साक्ष देत होता. 

त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. आता सर्व वानार सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता.

त्यानुसार सर्वाना भेटवस्तू, त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी हनुमंताची वेळ आली .आता माता सीतेला प्रश्न पडला की हनुमंताला कोणती भेट द्यावी? 

त्यावर त्यांनी हनुमंतालाच विचारले,"तात! आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी? "त्यावर हनुमंत म्हणाले , "माते, श्रीरामांनी मला सर्व काही दिले आहे . 

पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा मोह होतोय, 'श्रीरामांनी त्यांच्या कंबरे भोवती बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा.' " त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामांच्या कंबरेचे काढले आणि हनुमंताच्या कंबरेला बांधले. भक्तांच्या प्रेमा पेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या श्रीरामांचा आणि हनुमंताचा सर्वांनी जयजयकार केला. 

"प.पू .बापू त्यावेळी म्हणाले होते कि," ही कथा जो कुणी गुढी पाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल ते मी आता सांगणार नाही."

. !! हरिओम !!

Friday, January 24, 2025

क्षमासुगंध प्रार्थना (प्राकृत)

हे माझ्यावर अतिशय प्रेम करणार्‍या क्षमाशील आदिमाते, तू खूपच चांगली आहेस गं॥ 
तू आणि तुझे पुत्र मला बळजबरीनेसुद्धा तुझ्याच पायाशी ठेवोत ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्या त्रिविध देहातील व जीवनातील प्रत्येक कणाला व क्षणाला तुझा आशीर्वाद असू दे ॥ 

माझ्या त्वचेचा प्रत्येक बिंदू तुझी प्रार्थना करू दे ॥ आणि त्या बिंदूला तू शुद्ध कर ॥

 माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍याने तुझे नाम, गुण गाऊ दे ॥ आणि माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला तू स्वच्छ करीत रहा ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्यासमोर सगळंच्या सगळं आणून ठेवू नकोस ॥ कारण मला वेगवेगळ्या गोष्टींमधून नेमकी उचित गोष्ट निवडता येत नाही ॥म्हणून श्रीचण्डिकाकुलालाच निवड करू दे ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आणि तुम्हीच निवडा ॥ निवड तुझ्या हातात आणि त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार माझ्या हातात असू दे ॥ तुझ्या मनीचा संकल्प सद्गुरुंच्या शब्दांतून माझ्या कानात येऊ दे ॥ आणि आज्ञापालनाची बुद्धी माझ्या डोक्यात असू दे ॥

 हे क्षमाशील आदिमाते, जे जे चांगले तू मला दिले आहेस, ते मला आठवू दे ॥ 

आणि हे क्षमाशील आदिमाते, माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर,

 मला तुम्हाला माझ्यामुळे आनंदित झालेले बघायचे आहे ॥

Thursday, January 16, 2025

किरात रुद्र सूक्त

आदिमाता महिषासुरमर्दिनीचा व तिच्या तीनही चण्डिकापुत्रांचा विजय असो ॥१॥ 

हे किरातरुद्रा, तूच मनुष्याच्या त्रिविध देहातील सर्व अवरोधांना अर्थात अडथळ्यांना तोडणार्‍या इंद्रशक्तिला बळ पुरवीत असतोस ॥२ ||
 हे किरातरुद्रा, तू माझ्या इंद्रशक्तिला बलवान कर व माझे संरक्षण होऊ दे ॥३॥ 

मेघांच्या गर्जनांइतक्या दुष्टांच्या गर्जनासुद्धा तू एका क्षणात बंद पाडतोस, मी तुझा दास आहे ॥४॥ 

हे राघवेंद्रा, माझ्या जीवनात वृत्रासुर आल्यास तू त्याचा ताबडतोब नाश कर ॥५॥ 

हे किरातरुद्रा, वृत्रासुर माझ्या जीवनात येऊच नये म्हणून तूच माझ्याकडून आदिमातेची भक्ती करवून घे ॥६॥ 

हे राघवेंद्रा, कुठलेही पिशाच मला त्रास देऊ नये म्हणून तू संयोग-वियोग अर्थात् शांभवी विद्येचा उपयोग करून माझे रक्षण कर ॥७॥ 

हे किरातरुद्रा, ही शांभवी विद्या मला सहाय्यभूत व्हावी म्हणून माझ्याकडून तूच शंभुची अर्थात् परमशिवाची भक्ती करवून घे ॥८॥

 हे राघवेंद्रा, तू अधियोग-नियोग अर्थात् पुरुषार्थविद्येचा उपयोग करून माझे सर्व बाजूंनी संरक्षण कर ॥९॥ 

हे किरातरुद्रा, तू प्रयोग निष्प्रभ करणार्‍या ज्योतिर्विद्येचा उपयोग करून माझ्यावर सोडलेल्या दुष्प्रयोगांना नामशेष कर ॥१०॥

 हे किरातरुद्रा, दत्तात्रेय, तू व परमशिव असे तिघेही माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अधिकाधिक सुरक्षित व निर्भय करा ॥११॥ 

हे किरातरुद्रा, तुझे सामर्थ्य अतर्क्य आहे व तुझी कृपा मला हवी आहे ॥१२॥ 

हे परमशिवा, तू तर अत्यंत भोळा आहेस व कृपाळूही, मी तुझे नामस्मरण करतो ॥१३॥

 हे परमशिवा, तूच मला चण्डिकाकुलाचा सदस्य बनवून माझे जीवन सफल कर ॥१४॥

 हे आदिमाते महिषासुरमर्दिनी, हे शिवे! नित्यशिव, सदाशिव व परमशिव ह्या तिघांच्याही चरणी मला सदैव आश्रय मिळू दे ॥१५॥

 हे महिषासुरमर्दिनी, तूच बिंदुमंडलवासिनी ब्रह्मविद्या आहेस, तूच एकमेव परमेश्वरी आहेस.


त्रिविक्रम उवाच : ‘‘प्रिय मित्रांनो! हे किरातरुद्रसूक्त म्हणजे सर्व चण्डिकाभक्तांसाठी वृत्रासुर व भयकारिणीच्या दुष्प्रभावांना नाहीसे करणारे सोपे साधन आहे.’’